अनुराधाबाईंची कविता : मराठी भाषा जिवंत आहे तोवर या वह्या बुडीत खाती जाणे नाही !
'आता वह्या सगळ्या बुडीत खाती' हा कवयित्री अनुराधा पाटील यांचा साहित्य अकादेमी पुरस्कारोत्तर प्रकाशित झालेला नवा कवितासंग्रह. एकूण प्रकाशित संग्रहसंख्येच्या क्रमान्वये सहाव्या क्रमांकाचा व इ.सन १९८१ ते २०२२ या प्रदीर्घ कालावधीतील सुमारे ४०-४२ वर्षांच्या सातत्यपूर्ण लेखनप्रवासातला सर्वात अलीकडचा लेखन ऐवज! वरील तपशील मुद्दाम उल्लेखिण्याचे कारण असे की, अनुराधा पाटील यांच्या कवितेवर काही बोलताना विशिष्ट संग्रह समोर ठेवून त्या एका पुस्तकापुरतेच बोलणे हा त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा संकोच करण्यासारखे असेल. म्हणून 'आता वह्या सगळ्या बुडीत खाती...' बद्दल बोलताना प्रामुख्याने दोन पैलूंना अधोरेखित करावे लागेल. एक, कवी म्हणून व्यक्तिगतरित्या दरनव्या संग्रहागणिक निरीक्षणास येणारी काव्यात्म व्यक्तिमत्त्वाची उत्क्रांती आणि दुसरे, त्या-त्या लेखनकाळात घडणाऱ्या भवतालाविषयी अभिव्यक्तीने नोंदवलेला सजग समकालीन हस्तक्षेप. 'उत्क्रांती' ही जरी जैवशास्त्रीय परिभाषा असली तरी ती कलावंताच्या जाणीव नेणीवांचा पैस कसा विस्तारत जातो, त्याचे परिपक्व होत जाणारे आत्मभान क्रमशः कसे विश्वभानाकडे...


